Friday, June 28, 2019

आंबेडकरपुर्व दलित शाहिरी


आंबेडकरपुर्व दलित शाहिरी

प्रस्तावना 

पारंपारीक पध्दतीने रचना करणारे अनेक दलित शाहिर आंबेडकरपुर्व कालखंडात होऊन गेले,पण दलितांचे दु: - वेदना,प्रश्नानांना वाचा फोडणारे शाहिर म्हणुन गोपाळबाबा वलंगकर आणि किसन फागु बनसोडे यांच्या शाहिरीचा या भागात उल्लेख महत्वपुर्ण ठरतो.सत्यशोधक जलशातुन प्रेरणा घेऊन या शाहिरांनी दलित वेदनांना वाचा फोडल्याचे दिसुन येते.

गोपाळबाबा वलंगकर

कोकणातील रावढळ हे गोपाळबाबा वलंगकरांचे जन्मगाव.ब्रिटीशांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले.ब्रिटीश सैन्यात त्यांनी नौकरी केली.महात्मा जोतीबा फुल् त्यांचे समकालीन होते आणि त्यांचा सहवास त्यांना लाभला होता.महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.सैन्यातुन निवृत्त होताच त्यांनी समाजकार्यात वाहुन घेतले.त्यानी दापोलीत 'अनार्थ दोषपरिहार' नावाची संस्था स्थापन करून समविचारी मित्राचे संघटन बाधले.ब्राम्हण वर्चस्व झुगारल्याशिवाय आपनास गती नाही असे त्यांनी समाजास सागीतले आणि विवाह समारंभात ब्राम्हणांचे पुरोहीत्य नाकारले. अस्पृश्यता कशामुळे सोसावी लागत आहे, हे त्यांती बरोबर जाणले होते.गोपाळबाबानी महात्मा फुले प्रमाणेच हिंदुचे धर्मग्रथं आचारसंहितेवर तोफा डागल्या,त्या साठी त्यांनी हिंदुच्या धर्मग्रथांचा सुक्म अभ्यास तर केलाच होता,परतु इतर धर्मीचाही अभ्यास करून आपल्या कार्याला विचाराला बुद्धिप्रमाण्यवादाचे जोड दिली होती. त्यामुळे त्याची वैचारीक बैठक पक्की होती.म्हणुनच ते नुसते शाहिर,विचारवंत,कार्यकर्ते नव्हते,तर कर्ते सुधारक होते,असे म्हणावे लागते.गोपाळबाबानी विपुल प्रमाणात गिते रचली,गितांमधुन अस्पृश्यतेच्या मुपळावर घाव घालताना गुलामीची सवय झाल्याने निष्क्रिय होऊन बसलेल्या आपल्या समाजबांधवांबद्दल संताप व्येक्त केलेला दिसुन येतो.हा संताप त्यांना झोपेतुन जागे करण्यासाठी आहे.एका गितांत ते म्हणतात

पोटे जळतात तर सोद्यांनो काटेही भरा
पुर्वापर दु:खाची मनी आडवण करा !!

गोपाळबाबा आपल्या गितातुन ब्राम्हणावर,त्यांनी प्रस्तापित केलेल्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर हल्ला करतात,तसेच हजारो वर्षापासुन अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करणारया अस्पुश्यांना ब्राम्हणांचे कपट ओळखण्याचे आवाहनही करतात.

हेच शास्त्रकर्ते हेच न्याय देते !
गुरु हेच होते पुर्वकाळी !!
म्हणुनी या नीचानी तुम्हा निच केले !
श्रेष्ठत्व आणिले आपणास !!!!
*****
ब्राम्हणेतरांनो विचार तुम्ही करा !
आभिमान धरा मानवाचा !!!!

आजची जी समाजव्यवस्था आहे.ती ब्राम्हणांनी लादली आहे,त्यांनी तुम्हाला निच ठरविण्याचा गुन्हा केलाय; पण आज अस्पृश्यांनी त्यांचा दहुटप्पीपणा ओळखायला हवा,त्याशिवाय अस्पृश्यांचा उध्दार होणार नाही,असे आवाहन गोपाळबाबानी या गितातुन केले आहे.गोपाळबाबानी आंबेडकरपुर्व काळात महात्मा जोतीबा फुले यांचा समतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गितरचना केली.त्यांच्या गितामधुन ब्राम्हणी वर्चस्व,हिंदुचे धर्मग्रंथ,वर्णव्यवस्था,जाती व्यवस्था आणि त्यामुळे अस्पृश्यांची झालेली दयनीय स्थिती या संबंधाचे हृदयविदारक विचार पाहावयास मिळतात. या गितामधुन ब्राम्हणीय वर्चस्व,चातुर्वर्ण्य व्यवस्थे विरूध्द चिड, संताप जसा व्येक्त होतो,तशीच ही अन्यायी व्यवस्था उलथवुन लावण्या संबंधीची भावना दिसुन येते.

किसन फागु बनसोडे

आंबेडकरपुर्व काळात गोपाळबाबा वलंगकरांनतर किसन फागु बनसोडे यांच्या कार्याचा उल्लेख महत्त्वपुर्ण ठरतो. नागपुर जवळचे मोहपा हे त्यांचे मुळ गाव. त्यांनी शैक्षणिक पात्रता असुनही नोकरी करता स्वत:ला समाजकार्यासाठी वाहुन घेतले.१९०९ मध्ये नागपुर येथे 'सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज' नावाने संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबविले.'१९०७ साली नागपुरच्या पाचपावली भागात चोखामेळा मुलीची शाळा काढली.वसतीगृह,फिरते वाचनालय,नवसाक्षर प्रोढ वर्ग इतर अनेक शाळांच्या माध्यमातुन त्यांनी आपले कार्य तडीस नेहण्याचा प्रयत्न केला. १९०१ पासुनच त्यांनी शाहिरी लेखनाला सुरवात केली त्यांचा स्वत:चा जलसाही होता.एका साधुची फजिती 'पारतंत्र्य विमोचन' अथवा 'अंत्याज सुधारणेचा मार्ग',सनातन धर्माचा पंसमारोपतमाशा' आदी जलशांच्या माध्यमातुन समाजजागृतीचे काम केले.त्यांच्या गितातुन गुलामीची व्यथा सलताना दिसते. आपल्यावर आपल्या समाजावर लादलेल्या गुलामीबद्दल ते संताप व्येक्त करतात.

थु; तुमच्या तोंडावर लेक होss
कसले वतनदार,महार तुम्ही,कसले वतनदार
वतनदाराची बघा लेकरे फिरती दारोदारी !!
धरूनी काठी,खेडर हाती
परी एेट झाकदार दावता तुम्ही
जोहर ना करी त्या मारी पाटिल खेटर तोडावरी !!

*****

गुरे ओढणे लाजिरवाणे
धिक् हा संसार तुमचा रे
उच्छिष्टाची आस सदा धड मिळेना भाकर

******

अंगण झाडणे, केर फेकणे
नित्याचा व्यवहार तुमचा रे
ह्या कामगिरीचे हक्क केवढे, उष्टे तुकडे चार

अस्पृश्यतेचे चटके सहत गावकीची कामे निमुटपणे करीत असलेल्या आपल्या समाजबांधवाबद्दल या गितातुन चिड व्येक्त झालेली दिसुन येते,पण ही चिड त्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने व्येक्त झालेली आहे.ही हीन कामे सर्वांनी सोडुन द्यावीत असे आवाहनच या गितात आहे.शाहीर बनसोडे अन्य एका गितात म्हणतात......

दलित बांधवा जाण रे
समजुन घे ही खुण रे
भटपाशातुन मुक्त व्हाया
कर काही तरी यत्न रे १०

भट,ब्राम्हणांनी तुमच्यावर ही गुलामी लादलेली आहे आणि यातुन मुक्त होण्यासाठी तुमचे तुम्हाला स्वत;लाच प्रयत्न करावे लागतील, असा संदेश या गितातुन वेक्त होत आहे. दलित समाज अदन्यान अधंकारात खितपत पडलेला असल्यामुळे ही गुलामी पिढ्यानपिढ्यांपासुन सुरु आहे.ती झुगारून द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय अन्य उपाय नाही,असे ते पुढील गितात सांगत आहेत.....

ऊठ शिक तातडी,बाराखडी,खडी तालीम सोड आता धर स्वाभिमान मिळवी मान,
 अपमान चुकवी तु पुरता११

शिक्षणामुळे स्वाभिमान जागृत होतो,समाजात मान-सन्मान मिळतो. म्हणुन शिक्षणाचा मार्ग त्वरीत अवलंबावा,असे आवाहन या गितातुन त्यांनी केले आहे. किसन फागु बनसोडे यांच्या गितांतुन 'दलित धगधगत्या अंत;करणाचे प्रतिबिंब १२ उमटलेले दिसुन येते.

समारोप

डॉ,बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयापुर्वी दलित समाज अदन्या-अंधकाराच्या गर्तेत अडकलेले होता,अंधरूढी-प्रथा आणि अनिष्ट चालीरीतींनी त्याला जखडुन ठेवले होते, गोपाळबाबा वलंगकर आणि किसन फागु बनसोडे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय जलशातुन प्रेरणा घेऊन, गिते आणि जलशाच्या माध्यमातुन वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे उच्चाटन करन्याची पायाभरनीस सुरुवात केली आणि दलित समाजाच्या वेदनेला वाचा फेडली असे म्हनावी लागेल.

संदर्भ
डॉ,पानतावणे गंगाधर,'वादळाचे वंशज', प्रचार प्रकाशन नागपुर,१९८२,पृष्ट
डॉ, मेश्राम योगेद्रं,' दलित साहित्य : उद्गम आणि विकास',श्री मंगेश प्रकाशन,नागपुर,पृष्ट १०६
३डॉ, किरवले कृष्णा,'आंबेडकर शाहिरी:एक शोध', नालंदा प्रकाशन औरंगाबाद,पृष्ट २३
डॉ पानतावणे गंगाधर,अस्मितादर्शन- दिवाळी अंक १९८५ (लेख गोपाळबाबा वलंगकर यांची .काव्य रचना) पृष्ट १२०
कित्ता-१२०
डॉ,किरवले कृष्णा,'आंबेडकर शाहिरी: एक शोध' नालंदा प्रकाशन औरंगाबाद, पृष्ट ५५
कित्ता - ५६
कित्ता - ५६
कित्ता - ५८
१० कित्ता - ५८
११ डॉ, पानतावणे गंगाधर,'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', विजय प्रकाशन नागपुर,२००४,पृष्ट ५९
१२ कित्ता - ७८